Thu Jan 01 21:43:09 IST 2026
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले आहे, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले. मी यासंबंधी काहीही स्टेटमेंट करू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाबद्दल आकडेवारीसह महत्त्वाचे संकेत दिले आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढेल आणि लवकरच तिन्ही पक्ष जागावाटपाला अंतिम स्वरुप देतील असं फडणवीस म्हणाले. भाजप २६ जागा लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. असं झाल्यास शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २२ जागा मिळतील असा कयास बांधला जात आहे. मात्र, जागावाटपावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे अजित पवार यांनी टाळले आहे. लोकसभेच्या जागावाटपावर बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला आहे. पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी पवारांनी बारामतीतील विकास कामांची पाहणी केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणावरून समाजात तेढ निर्माण होत असल्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची घडी बसवली. त्यानंतर अनेकांनी या राज्याला पुढे नेले. आता विकासाचे प्रश्न बाजूला पडले आहेत. रोज वेगवेगळे नेतेगण, प्रवक्ते, मान्यवर, राजकीय पदाधिकारी, सत्ताधारी, विरोधक बोलत आहेत. समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी असे वक्तव्य कोणीही करु नये. प्रत्येकाने आपापली भूमिका मांडावी. आपल्या मागण्या सरकारकडे मांडाव्यात. सरकार त्यात लक्ष घालेल असे आश्वासन पवार यांनी दिले आहे.