Mon Nov 17 17:46:56 IST 2025
नागपूर, दि. 30 राज्यात ब-याच जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस, दुबार पेरणी आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर पीक नोंदणी करण्यात आलेली नाही. तसेच डिजीटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत राज्यातील एकूण ३६.१२ टक्के पिकांची नोंद झाली आहे. तरी, पीक नोंदणी न झाल्याने नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज इत्यादी लाभांपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये
यासाठी सहायक स्तरावरून करावयाच्या पीक नोंदणीला ३० नोव्हेंबर २०२५ अखरेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार खरीप हंगाम २०२५ ची ई-पीक पाहणी नोंदणी १०० टक्के पूर्ण करण्यात येणार आहे.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णयान्वये संपूर्ण राज्यामध्ये ई-पीक पाहणी डिजिटल क्रॅाप सर्वे अंतर्गत मोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी करण्यात येते. राज्यात खरीप हंगाम २०२५ हा १ ऑगस्ट, २०२५ पासून सुरु झाला असून त्या अंतर्गत १ ऑगस्ट, २०२५ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी ही सुरु होती. तसेच १ ऑक्टोबर, २०२५ पासून सहाय्यक स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात येत असून त्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर अशी होती. ती आता वाढविण्यात आली आहे.